अहमदनगरएका तासापूर्वी
- कॉपी लिंक
अहमदनगर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गुरुवारी रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील मक्याचे पीक पूर्णपणे झोपले असून, शुक्रवारी (17 मार्च) ला थेट शेतीवर जाऊन पाहणी केली असता अवकाळी पावसामुळे बागेतील संत्री मोसंबी गळून पडली आहे. तर हातात आलेला गहू भिजला आहे. अवकाळी पावसाने शेतकरी मेटाकुटीस आला असतानाच नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे मात्र आता महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अडलेले आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील नगर, पारनेर, कर्जत जामखेड, पाथर्डी,शेवगाव, नेवासे, राहुरी या तालुक्यांत गुरुवारी रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.पावसाचे प्रमाण कमी असले तरी वादळी वाऱ्यामुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मक्याचे पीक पूर्णपणे झोपले आहे. तर फळबागांतील मोसंबी ,संत्री बागेतच गळून पडली आहेत.
तर काही ठिकाणी अवकाळी मुळे मोसंबी, संत्री सडण्याच्या मार्गावर आहे. विशेष म्हणजे यंदा चांगल्या पावसामुळे रब्बी हंगामातील गव्हाचे क्षेत्र सरासरीपेक्षा अधिक वाढले असतानाच अवकाळी पावसाने या गव्हाच्या पिकावर घाला घातला आहे. अवकाळी व गारपिटीच्या पावसामुळे काढणीवर आलेला गहू भिजला आहे. उशिरा लागवड केलेल्या गव्हावर सर्वाधिक परिणाम या अवकाळी पावसाचा झाला आहे.
गेल्या आठ दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्यात झालेल्या गारपिटीच्या व अवकाळी पावसामुळे 4 हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले होते. त्याचा सर्वे सुरू असतानाच गुरुवारी पुन्हा एकदा पावसाने झोडपले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे नुकसान झाले असतानाच या नुकसानीचे पंचनामे मात्र महसूल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे थांबलेले आहेत. जिल्ह्यातील सर्वच महसूल कर्मचारी संपावर आहेत. तलाठी,मंडलाअधिकारी हे महसूल विभागातील कर्मचारी संपावर असल्यामुळे हे पंचनामे कोण करणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
बारा तासांत झालेला पाऊस
गेल्या बारा तासात अहमदनगर शहरातील नालेगाव 5.6, सावेडी 5 ,कापूरवाडी 5, जेऊर 5,भिंगार 5 ,रुईछत्तीसी 5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, कर्जत तालुक्यात पाच मिलिमीटर पाऊस झाला आहे.