21 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक
अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याच्या मागणीसाठी आजही विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी करत आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
LIVE
- अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याबाबत सरकारकडून काहीही सांगितले जात नाही, असा आरोप करत विधानसभेत आज विरोधकांनी सभात्याग केला आहे. तसेच, अनेक भागात नाफेडने अजूनही कांदा, हरभरा खरेदी सुरू केलेली नाही. सरकार सभागृहात खोटे बोलत आहे, असा आरोपही विरोधकांनी केला आहे.
- अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचे युद्धपातळीवर पंचनामे केले जाईल. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत केली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.
- आज अधिवेशनात केवळ अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर चर्चा करावी, अशी मागणी करत विधानसभेत विरोधकांनी स्थगन प्रस्ताव सादर केला आहे. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व ठाकरे गटाच्या आमदारांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
- अवकाळीग्रस्त शेतऱ्यांना नुकसान भरपाई मिळालीच पाहीजे, बळीराजाला तातडीने मदत करा, अन्यथा खुर्च्या सोडा, अशा घोषणा विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर दिल्या. या आंदोलनात विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ, रोहित पवार यांच्यासह काँग्रेस व शिवसेनेचे आमदार सहभागी झाले होते.
- राज्यात सत्तांतर होताच शिंदे-फडणवीस सरकारने विकासकामांना स्थगिती दिली, याचाही निषेध करत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणा दिल्या.
- सत्तांतरानंतर आज शिंदे-फडणवीस सरकार प्रथमच आपला अर्थसंकल्प सादर करत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्याकडे अर्थविभागाचा कारभार आहे. त्यामुळे अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचाही हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. दुपारी दोन वाजता देवेंद्र फडणवीस विधानसभेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत. वाचा सविस्तर
- कसबा पेठेचे नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज विधानसभेत आपल्या आमदारकीची शपथ घेतली.
हे वृत्त सातत्याने अपडेट होत आहे…
ठाकरे गटाचा घणाघाती हल्ला:अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला, राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले
अवकाळीमुळे शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. राज्य सरकार मात्र भांग ढोसून पडले आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे की, महाराष्ट्रात धुलीवंदन उत्साहाची भांग सत्ताधाऱ्यांना जरा अतीच चढली होती. भांग पिऊन नाचण्यासाठी खास दिल्लीहून निमंत्रित बोलावले होते. धुलीवंदनाचा जलसा जुहूच्या पंचतारांकित हॉटेलात सुरू होता. त्याच वेळी महाराष्ट्राचा शेतकरी अवकाळी आणि गारपिटीने उद्ध्वस्त होत होता. हे चित्र विदारक आहे. वाचा सविस्तर