मुंबई इंडियन्ससाठी इंडियन प्रीमिअर लीगचे १५वे सत्र काही खास ठरेल असे वाटत नाही. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे. अशात गुरुवारी चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या लढतीत विजय मिळवून गुणखाते उघडण्यासाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू कसून सराव करत आहेत. पण, त्यातही व्यत्यय आला. बुधवारी मुंबई इंडियन्सच्या सराव सत्रात मधमाशांनी हल्ला केला आणि खेळाडूंना स्वतःला वाचवण्यासाठी मैदानावर लोटांगण घालावे लागले. मुंबई इंडियन्सने स्वतःच्या सोशल मीडियवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
आयपीएलची सर्वाधिक ५ जेतेपदं नावावर असलेल्या मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात सहा सामन्यांत एकही विजय मिळवता आलेला नाही. हार्दिक पांड्या, कृणाल पांड्या, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक ही बसलेली घडी विस्कळीत झाल्यानंतर मुंबई इंडियन्स जणू विजय मिळवणे विसरलाच आहे. १५ कोटींपेक्षा अधिक रक्कम मोजून संघात पुन्हा दाखल करून घेतलेल्या इशान किशनला काही खास करता आलेले नाही. कर्णधार रोहित शर्माचा फॉर्मही चिंतेचा विषय ठरतोय. त्यात प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही प्रभाव पाडता आलेला नाही. डेथ ओव्हरमध्ये त्याला साथ देणारा गोलंदाज मुंबई इंडियन्सकडे नाही. अशात सराव सत्रात मधमाशांनी व्यत्यय आणला आहे.
“मुंबई इंडियन्सची यंदाच्या हंगामातील कामगिरी फारशी चांगली नाही. पण सर्वोत्तम खेळाडूंनादेखील अनेक वेळा दडपणाच्या स्थितीतून जावं लागतं. एक फटका संपूर्ण सामन्याचा कल बदलून टाकू शकतो. पण मला खात्री आहे की, अशा कठीण प्रसंगातून ‘मुंबई इंडियन्स’ला बाहेर कसं काढायचं, हे रोहित शर्मा आणि किरॉन पोलार्डसारख्या बड्या खेळाडूंना नीट माहिती आहे”, असा विश्वास मुंबई इंडियन्सचा नवा गोलंदाज जयदेव उनाडकट याने व्यक्त केला. सलग सहा सामन्यांत पराभव पत्करावा लागल्यानंतर मुंबई इंडियन्सची स्पर्धेतील आव्हान टीकवण्याची धडपड सुरू झाली आहे.
मुंबई इंडियन्स विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज हा सामना कायमच रोमांचक असतो. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज दोन्ही संघ आयपीएल च्या इतिहासातील सर्वोत्तम संघ मानले जातात. यंदाच्या वर्षी या दोघांना फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. सीएसकेचे ६ सामन्यात केवळ २ गुण आहेत. तर मुंबईला ६ सामन्यांपैकी एकही सामना जिंकता आलेला नाही. अशा परिस्थितीत फॉर्मशी झगडत असलेल्या सीएसके विरूद्ध विजयी लयीत परतण्यासाठी रोहित शर्माच्या मुंबईने खास प्लॅन तयार केला आहे.
मुंबई चेन्नई ही लढत रोमांचक होणार हे नक्की. दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक असल्यामुळे दोन्ही संघ दमदार कामगिरी करणार यात वादच नाही. आमच्या संघाची मोठी समस्या म्हणजे शेवटच्या षटकांमधील गोलंदाजांची कामगिरी. गोलंदाजीतील ही समस्या दूर करण्यासाठी आम्हाला एकत्रितपणे नीट विचार करावा लागणार आहे आणि सांघिक कामगिरीतून यावर तोडगा काढावा लागणार आहे. मैदानावर झटपट निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. दडपणाचा वापर चांगली कामगिरी करण्यासाठी करायला हवा आणि हाच आमचा प्लॅन असेल”, अशी माहिती मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकटने दिली. त्याने आज पत्रकार परिषदेत काही प्रश्नांची उत्तरे दिली.
“मैदानात काही वेळा उत्स्फूर्तपणे निर्णय घ्यावे लागतात. स्वत:वर विश्वास ठेवून काही निर्णय घेतले जायला हवेत, पण गेल्या एक-दोन सामन्यात तसं होताना दिसत नाहीये. पण मुंबई इंडियन्सने आतापर्यंत सगळ्या प्रकारचे चढ-उतार पाहिले आहेत. आम्ही वाईट कामगिरीही पाहिली आहे. आम्ही विजेतेपदंही पटकावली आहेत. त्यामुळे सध्याच्या कठीण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी आम्हाला आमचं डोकं शांत ठेवावं लागेल. पुढच्या प्रत्येक सामन्यात मैदानावर असलेल्या प्रत्येक खेळाडूला सर्वस्व पणाला लावावं लागणार आहे. दडपण असेल हे नक्की, पण त्या दडपणाच्या काळात तुम्ही किती शांतपणे परिस्थिती हाताळता, हे अधिक महत्त्वाचे आहे”, असेही त्याने स्पष्ट केले.